
निर्दोषात्वाचा दाखला एसीबी देऊन न्यायाधिशांचा भुमिका बजावू नये.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
लाच प्रकरणात तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर हस्तकाकरवी लाच मागणी केल्याचा आरोप आहे. यात हेळकर दोषी आहेत किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला नाही. या प्रकरणाचा न्यायालयात पुराव्यावर त्याचा सोक्षमोक्ष व्हावयास पाहिजे. हेळकर निर्दोष असतील तर त्यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल. त्यांना निर्दोषत्वाचा दाखला देवून लाच लुचपत विभागाने न्यायाधिशाची भुमिका वटवू नये. असा सुचक इशारा तक्रारदाराने दिला आहे.
शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे नाव आरोपी म्हणून वगळले? या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी,आरोपी न केल्यास प्रकरण उच्च न्यायालयात जाणार या “खमक्या”ती वृत्तानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षकार, नागरिक, शेतकरी यांच्या भुवया उंचावल्या असून महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश राज्य पातळीवरून करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच कार्यवाही सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, तक्रार अनुषंगाने शिरोळ तहसील कार्यालयातील त्या “तीन” कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी विधाने करून “फाजील आत्मविश्वास” नोंदवण्याचा “केविलवाणा” प्रयत्न सुरू केला आहे. परंतू, सन 2021 मध्ये कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी नगरपालिकेत केलेली कारवाई निश्चितच डोळ्यावरील धुके बाजूला करण्यास पोषक ठरेल यात शंका नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी नगरपालिकेत कारवाई करून नगर रचना विभागाचे अभियंता बबन कृष्णाजी खोत व कार्यालयातील उमेदवार किरण कुमार कोकाटे यांच्यावर 25 हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याची शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 583/2021 ने फिर्याद दाखल करण्यात आली.
स्विकारण्यात आलेली लाच मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगर रचनाकार रणजीत कोरे यांच्याकरिता स्विकारण्यात आली असताना केवळ खोत व कोकाटे या दोघा विरुद्धच गुन्हा का दाखल केला?. इतर दोघावर गुन्हा का दाखल नाही?. अन्य दोघांना का वगळण्यात आले, याच्या मुळापर्यंत जाऊन सत्य वस्तूस्थित शहरवासियासमोर आणण्यासाठी सामाजिक स्तरावरील कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली.
चौकशीअंती तब्बल चार वर्षा नंतर तत्कालीन मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगर रचनाकार रणजीत कोरे यांच्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेंगल व कोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द होण्यासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने दावा फेटाळून लावला.
सध्या, हा खटला इचलकरंजी जिल्हा न्यायालयात (48/2025) सुरु आहे. हे एकच प्रकरण वा घटना वाचाळ वीरांच्या “फाजील आत्मविश्वासा”ला पूरून उरणारी ठरेल असा तक्राराने विश्वास नोंदवला आहे. लाचलुचपत ने इचलकरंजी प्रकरणात एक न्याय आणि हेळकरांना दुसरा न्याय अशी मनमानी भुमिका घेतल्यास एसीबीला न्यायालयान खेचण्याची तयारी तक्रारदाराने केली आहे.


