तांबे अकॅडमी मानसिक व शारीरिक अत्याचाराचे केंद्र ?, मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ? यशच्या मृत्यूला कोण जबाबदार ?
आत्महत्या नसून घातपात केल्याचा संशय, शवविच्छेदन कोल्हापूर सीपीआर मध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणार !
आत्महत्यास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ; अजित यादव
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
विद्यार्थी व विद्यार्थिनीवर वेगवेगळ्या कारणातून शारीरिक व मानसिक अत्याचार करण्यावरून चर्चेत असलेल्या इचलकरंजी येथील तांबे अकॅडमीच्या वसतिगृहावर सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यश अजित यादव या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बाथरूम मध्ये आत्महत्या केल्याची खळबळ जनक माहिती उघडकीस आली आहे.
आत्महत्या पीडित मुलाचे वडील व अन्य नातेवाईकांनी मुलाच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अ वर्ग दर्जाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, कोल्हापूर सीपीआर मध्ये करण्यात यावे अशा नातेवाईकांच्या मागणीला यश आले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला आहे.
मयत मुलाच्या नातेवाईकांनी इचलकरंजी शहरांमध्ये शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे इचलकरंजी आरोग्य प्रशासन, श्रद्धा अकॅडमी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या कामकाज पद्धतीची शहरात उलट सुलट चर्चा रंगली आहे.
मयत यश हा नेहमी फोन करून, माझा शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे, जेवण वेळेवर दिले जात नाही, खराब झालेले जेवण दिले जाते, शिक्षक, वसतीगृहाचा प्रमुख पती-पत्नी कौंदाडे आणि अशोक तांबे असे लोक नाहक त्रास देतात, अशी फोनवरून वारंवार तक्रार करीत होता. अत्याचारामुळे त्याचे मनोबल ढासळले होते, असे त्याचे वडील अजित यांनी सांगितले.
दरम्यान, तांबे अकॅडमीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तीच पोस्ट लाखो लोकांनी पुन्हा पुन्हा व्हायरल केली. यावरून तांबे अकॅडमी बद्दल लोकांच्या मनात किती तिरस्कार आहे, खदखद आहे याचे चित्र इचलकरंजी शहरात पहावयास मिळत होते.
दरम्यान, मयत यश याचे वडील अजित यांनी मुलाच्या मृत्यू बाबत शंका व्यक्त केली असून वसतिगृहाचे प्रमुख, शिक्षक आणि कौदाडे तसेच अशोक तांबे या जबाबदारांवर जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशा आशयाची तक्रार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असल्याचे समजते.
तक्रारीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात जबाबदार व्यक्तिविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता बळावली आहे. यश याच्या मृत्यूनंतर गावभाग पोलीस ठाणे, श्रद्धा अकॅडमी प्रशासन यांच्यात वारंवार बैठका होत असल्याची इचलकरंजी शहरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, तांबे याने दीड वर्षांपूर्वी शिरदवाड मधील एकाला हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन केला होता, पण, जो फसला अशीही चर्चा शहरात रंगली आहे.