गांजा, अफीमची विक्री आणि पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयातून शिरोळमध्ये दीपक मगदूम युवकाची निर्घुन हत्या.
गांजा, अफीम विक्रीचा बिमोड करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांसमोर आव्हान. पोलिसांना दंडात्मक कारवाई करता येते ?
टीप देणारा एकटा, मॅनेज करणारे दुसरेच आणि खून झाला तिसऱ्याचाच अशी शहरात उलट सुलट चर्चा.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
गांजा, अफिमचा साठा आणि विक्रीची पोलिसांना वारंवार टीप का देतोस ?, अशा संशयातून, मनात राग धरून शिरोळ येथील दीपक मगदूम या युवकाचा कोयता (एडका) सारख्या तीक्ष्ण हत्याराबरोबर, दगड, लोखंडी गजाने वार करून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरोळ पोलिसांनी केवळ चार तासात खुनातील 7 संशयित आरोपींना व आरोपींना मदत करणारे 2 जणांना अशा एकूण 9 जणांना ताब्यात घेतले आहे.
घटनेनंतर, खरंतर पोलिसांना वारंवार टीप देणारा “यशवंत” नामक युवक बाजूला राहिला आणि दीपक फासाला गेला, अशी चर्चा शिरोळ शहरात दिवसभर होती. शिरोळ शहरात अफीम व गांजा साठा आणि विक्री अशा आशयाचे वृत्त “खमक्या”ने सहा महिन्यापूर्वी प्रसिद्ध केले होते. वृत्ताच्या अनुषंगाने पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेऊन कारवाई करून, काही लाखाचा दंड करून सोडून दिल्याची चर्चा सुद्धा पोलीस ठाणे आवारात रंगली होती.
“खमक्या”तील सत्य वृत्तानुसार पोलिसांनी सदरचे प्रकरण “हलक्यात” न घेता गांर्भिय लक्षात घेवून केवळ दंडात्मक कारवाई न करता कायदा दाखवला असता तर आज हा प्रसंग उद्भवला नसता, शिरोळ शहरातील 80 टक्के युवक, तरुण गांजा व अफीमच्या व्यसनाधीन झाले नसते, अशी शहरात भावनिक चर्चा आहे.
शिरोळ शहरात बेसुमार, बिनधास्तपणे अफिम नशेच्या गोळ्या व गांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. कारखाना उस आड्डा, छत्रपती शिवाजी शाळा, पुष्पक चित्र मंदिर, नदी वेस तिकटी, धरणगुत्ती रोड या सह निर्मणुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकडो युवक, तरूण गांजांचा धुर काढत बसलेले असतात. यांना कारवाईची कसलीच भिती नाही, त्यामुळे खून करण्याइतपत तरुणांची मजल पोहचल्याचे नागरिक बोलत आहेत.
गांजा, अफीम नशिल्या गोळ्याचा साठा व विक्री प्रकरणातून खून होण्याचा शिरोळ शहरातील हा पहिलाच प्रकार आहे. चळवळीचे माहेरघर आणि पुरोगामी विचारांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या शहराला खुनाचे गालबोट लागले आहे, टीप देणारा एकटा, मॅनेज करणारे दुसरेच आणि खून झाला तिसऱ्याचाच अशी शहरात उलट सुलट चर्चा आहे.