दुष्परिणाम न करणारे पाणी, कलेश्वर तलावात सोडून, मच्छीमारी, नौका विहार अशा प्रकल्पातून नगरपरिषदेने उत्पन्नाचा स्त्रोत वाढवावा.
शिरोळातील नागरिक, संघटना, संघ, पक्षप्रमुख, युवक व तरुणांनी जयसिंगपूर शहरात जाऊन भुयारी गटारी संदर्भात, नागरिकांची भावना विचारावी.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
जयसिंगपूर प्रमाणे शिरोळ शहरात भुयारी गटारीची मनमानी केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. शहराला गरज नसताना भुयारी गटर कशाकरिता असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
ज्या नगरपरिषदेला नवीन अमृत नळ पाणी योजनेची पाच टक्के रक्कम भरता आली नाही, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत केला जात नाही. ती नगरपरिषद मल व सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पाचे विज बिल दर महिन्याला भरू शकेल का ? एसटीपी चा खर्च नगरपरिषदेला पेलणारा आहे का ? असा सवाल शिरोळकर करीत असल्याचे समजते.
भुयारी गटारीमुळे शिरोळ शहरातील प्रत्येक मिळकत धारकांना कमीत कमी 1,200 रुपये इतका जादा कर भरावा लागणार आहे, भुयारी गटारीचा एकूण कर 1 कोटी 80 लाख रुपयांच्या आसपास जमा करावा लागणार आहे, म्हणजे शहरातील मिळकत धारकांच्यावर जवळपास 2 कोटी रुपये पर्यंतचा बोजा पडणार असल्याचे नागरिक बोलत आहेत.
प्रक्रिया करून एसटीपी मधून बाहेर पडणारे पाणी स्वच्छ आणि दुष्परिणाम करणारे नसल्याचा दावा केला जात आहे. हे पाणी शेतीला देऊन उर्वरित पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे समजते.
दुष्परिणाम न करणारे पाणी आहे तर, पंचगंगा नदी पत्रात सोडण्याऐवजी हेच पाणी हेरिटेज म्हणून नोंद झालेल्या कलेश्वर तलावात सोडण्यात यावे. त्या ठिकाणी मच्छीमारी, नौका विहार असे वेगवेगळे प्रकल्प करून नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवावा असे नागरिक बोलत असल्याचे समजते.
नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून गुजरात येथील ठेकेदाराला भुयारी गटारीचे कामकाज सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर दिल्याची माहिती समजून येत आहे. ठेकेदाराने जयसिंगपूर ,मिरज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी परवानगी मागितल्याचेही समजून येत आहे.
नजीकच्या काही दिवसात शिरोळमध्ये भुयारी गटारीचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे. उद्घाटनाच्या अनुषंगाने नगरपरिषदेतील एका कर्मचाऱ्याने उद्घाटन करण्यात येणाऱ्या जागेची रेखी केली असल्याचे समजते.
शिरोळ नगरपरिषदेकडून शहरात भुयारी गटारीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी नागरिक, संघटना, संघ, पक्षप्रमुख, युवक व तरुण यांनी जयसिंगपूर शहरात जाऊन भुयारी गटारी संदर्भात नागरिकांची काय भावना आहे, याचे मत घ्यावे. अशीही चर्चा शहरात सुरू आहे.